भारत-न्यूझीलंड दुसरी कसोटी : एजाजची ऐतिहासिक कामगिरी, अश्विनचे चार बळी
मुंबई : न्यूझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने मजबूत पकड मिळवली आहे. नाणेफेक जिंकून फलंदाजी करणाऱ्या भारताने ३२५ धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर न्यूझीलंडला पहिल्या डावात ६२ धावांत गुंडाळले. मात्र, त्यांना फॉलोऑन न देता भारताने पुन्हा फलंदाजी करण्यास सुरुवात केली. भारताने दुसऱ्या दिवसअखेर बिनबाद ६९ धावा केल्या. सलामीवीर मयांक अग्रवाल ३८ धावांवर तर चेतेश्वर पुजारा २९ धावांवर नाबाद आहे.
भारतीय संघाचा पहिला डाव ३२५ धावांत आटोपल्यानंतर न्यूझीलंडने आपला पहिला डाव सुरू केला. मात्र, दोन तासांच्या आताच टीम इंडियाने न्यूझीलंडचा संपूर्ण संघ पॅव्हेलियनमध्ये पाठवला. अश्विनने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. मोहम्मद सिराजने ३, अक्षर पटेलने २, तर जयंत यादवने एक गडी बाद केला.
तत्पूर्वी भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी डावखुऱ्या एजाज पटेलने एकट्याने भारताचा संपूर्ण डाव ३२५ धावात संपवला. एजाज पटेलने ११९ धावा देत भारताचे १० च्या १० फलंदाजांना बाद केले. एजाज पटेल आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका डावात १० विकेट घेणाऱ्या अनिल कुंबळे आणि जीम लॅकर यांच्या पंक्तीत जाऊन बसला.
भारताकडून मयंक अग्रवालने १५० धावांची दमदार खेळी करत भारतातील धावसंख्येच्या जवळपास निम्मा वाटा एकट्याने उचलला. त्याला अक्षर पटेलने ५२ धावांची अर्धशतकी खेळी करत चांगली साथ दिली. या दोघांनी सातव्या विकेटसाठी ६७ धावांची भागीदारी रचली. पहिल्या दिवसअखेर २५ धावा करून नाबाद असणारा वृद्धिमान सहा दुसऱ्या दिवशी दोन धावांची भर घालून परतला. सहाला बाद करत एजाज पटेलने आपल्या पाच विकेट पूर्ण केल्या. त्यानंतर आलेल्या आर. अश्विनचा पहिल्याच चेंडूवर त्रिफळा उडवत भारताचा सहावा फलंदाज पॅव्हेलियनमध्ये धाडला.
एजाज पटेलने भारताला पाठोपाठ दोन धक्के दिल्यानंतर शतकवीर मयांक अग्रवालने अक्षर पटेलला साथीला घेत डाव सावरण्यास सुरुवात केली. या दोघांनी भारताला २५० चा टप्पा पार करून दिला. या दोघांनी सातव्या विकेटसाठी नाबाद ६१ धावांची भागीदारी करत भारताला उपहारापर्यंत २८५ धावांपर्यंत पोहचवले. दरम्यान, मयांक अग्रवालही आपल्या दीडशतकाजवळ पोहचला होता.
उपहारानंतर मयंकने आपले दीडशतक पूर्ण केले. अक्षर पटेलनेही आपले अर्धशतक पूर्ण केले होते. मात्र, एका बाजूने सातत्याने भारताला धक्के देणाऱ्या एजाज पटेलने मयंकला बाद करत ही जोडी फोडली. त्यानंतर एजाज पटेलने अक्षर पटेलला बाद करत अनिल कुंबळेचा विक्रम आपल्या टप्प्यात आणला. त्यानंतर पटेलने १२ धावा करणाऱ्या जयंत यादवला बाद करत आपला नववा बळी टिपला. अखेर ४ धावांवर मोहम्मद सिराजला बाद करत विश्व विक्रमाशी बरोबरी केली.
अश्विनची कमाल…
- अश्विन (६२) न्यूझीलंडविरुद्ध ६०+ विकेट घेणारा पहिला भारतीय ठरला.
- आर अश्विनने आतापर्यंत वानखेडेवर ३४ बळी घेतले आहेत.
- या वर्षात अश्विनने आतापर्यंत एकूण ४८ विकेट घेतल्या आहेत.
अश्विनने शॉन पोलॉकचा विक्रम मोडला
मुंबईत सुरू असलेल्या कसोटी सामन्यात रविचंद्रन अश्विनने न्यूझीलंडच्या पहिल्या डावात ४ विकेट्सच्या जोरावर ४२३ कसोटी बळींची नोंद केली आहे. क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत तो आता १२ व्या क्रमांकावर आला आहे. अश्विनने शनिवारी दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज शॉन पोलॉकचा ४२१ विकेट्सचा विक्रम मागे टाकला आहे.
भारतात कसोटीतील निचांक कामगिरी
६२ धावा - न्यूझीलंड वि. भारत - २०२१
७५ धावा - भारत वि. वेस्ट इंडिज - १९८७
७६ धावा - भारत वि. द. आफ्रिका - २००८
७९ धावा - द. आफ्रििका वि. भारत - २०१५