एनसीबीचे प्रमुखपद रिक्त का?

मुंद्रा बंदरावर हेरॉईन जप्त केल्याप्रकरणी कॉंग्रेसचा केंद्र सरकारला सवाल


22nd September 2021, 12:10 am
एनसीबीचे प्रमुखपद रिक्त का?

एनसीबीचे प्रमुखपद रिक्त का?
मुंद्रा बंदरावर हेरॉईन जप्त केल्याप्रकरणी कॉंग्रेसचा केंद्र सरकारला सवाल
नवी दिल्लीः
गुजरातमधील मुंद्रा बंदरावर हजारो कोटी रुपयांची सुमारे ३,००० किलो हेरॉईन जप्त केल्याप्रकरणी कॉंग्रेसने केंद्र सरकारवर हल्ला चढवला आहे. अशा प्रकारचे ड्रग सिंडिकेट सरकार आणि नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या नाकाखाली भारतात कसे काय सुरू आहे? असा सवाल कॉंग्रेसने केला आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील मुंद्रा बंदरावर दोन कंटेनरमधून जवळपास १५,००० कोटी रुपयांचे २,९८८.२१ किलो हेरॉईन जप्त केले. त्यानंतर चेन्नईहून आयात कंपनी चालवणार्‍या एका जोडप्याला अटक केली, अशी माहिती अधिकार्‍यांनी मंगळवारी दिली.
नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोचे पूर्णवेळ प्रमुखपद हे गेल्या १८ महिन्यांपासून रिक्त का आहे? एनसीबीचा उपयोग हा भाजप आपल्या प्रतिस्पर्ध्यांविरोधात ’किरकोळ राजकारण’ खेळण्यासाठी करत आहे, असा आरोप कॉंग्रेस प्रवक्ते पवन खेडा यांनी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा, जे गुजरातचे आहेत, ते हे ड्रग सिंडिकेट तोडण्यास असमर्थ का आहेत? भारतात गेल्या काही महिन्यांत अंलमी पदार्थांची तस्करी मोठ्या प्रमाणात वाढली आहे, आणि हे काही वर्षांपासून सुरू आहे. हे केवळ भारतीय तरुणांचे वर्तमान आणि भविष्य नष्ट करणारे नाही, तर जागतिक स्तरावर दहशतवादी संघटनांना निधी पुरवण्याचा हा संभाव्य मार्ग आहे, असा आरोप त्यांनी केला.
अदानी समूहाच्या मालकीच्या - मुंद्रा बंदरात टाकण्यात आलेल्या ताज्या छाप्यात जवळजवळ तीन टन हेरॉईन जप्त होणं ही केवळ भारतातील नाही, तर जगातील सर्वांत मोठी बेकायदेशीर अंमली पदार्थ तस्करीची घटना आहे. या अंमली पदार्थांची किंमत बाजारात २१,००० कोटी रुपये होती, असे खेडा म्हणाले.
पण, इतक्या मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ भारतात आलेच कसे? नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो काय करत होते? अंमली पदार्थ तस्करांसाठी हा आवडता मार्ग बनला आहे. हे फक्त हिमनगाचे एक टोक आहे, असा आरोप करत खेडा यांनी अंमली पदार्थ तस्करीची अनेक उदाहरणे दिली.
भारत सरकार, गुजरात सरकार आणि एनसीबीच्या नाकाखाली अशा प्रकारची ड्रग सिंडिकेट भारतात कशी कार्यरत आहे? गुजरात हे ऐतिहासिक राज्य आहे. भारतासाठी महत्त्वाचे आहे. या राज्यात मोठे उद्योगही आहेत. पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहां हे गुजरातचे आहे. एवढचं नव्हे तर केंद्रातील अनेक वरिष्ठ अधिकारी हे गुजरातमधील आहे. मग इतक्या मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थांची तस्करी कशी काय झाली? पंतप्रधान मोदी अमित शहा गप्प का आहेत? त्यांनी उत्तर द्यावं, असे कॉंग्रेस प्रवक्ते पवन खेडा म्हणाले.